संतांची वैचारिक दिवाळी !
महाराष्ट्र म्हणजे विविध सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरांनी नटलेला सुंदर प्रदेश ! येथील प्रत्येक सण-उत्सव हा प्रतीकात्मक आणि नव विचारांची रुजुवात करून किंवा कांहीतरी टाकून देऊन, वर्ज्य करून साजरा केला जातो. अगदी चैत्राच्या पालवीनं मराठी नव्या वर्षाचं स्वागत करतांना इथली माणसं कडू लिंबाचा मोहर आणि गुळ खावून येणारं वर्ष हे आपण सर्वजण कडू-गोड आठवणींनी साजरं करण्याचं मनोमन ठरवतात, त्याबरोबरच येणाऱ्या उन्हाच्या झळा, उष्णता ही लिंबाचा फुलोरा आणि गुळाने मारून टाकण्याचे आयुर्वेदिक औषध प्राशन करून आयुर्वेद दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनवतात. असा हा भौतिक आणि सांकृतिक वसा आणि वारसा लोक भावनेने आणि विचाराने साजरा करतात. याबरोबरच हे सणसमारंभ साजरे होतांना येथील जनमाणसात कृषिसंस्कृतीचा महत्वपूर्ण ठेवा जोपासण्याचे काम सुद्धा सातत्याने केले जाते. प्रत्यके सण-उत्सव हा सोहळा म्हणून भौतिक पद्धतीने साजरा करतांना त्याला सुंदर विचारांची जोड देण्याचं महत्वपूर्ण कार्य येथील संत, विचारवंत, प्रबोधनकार आणि समाजसुधारक यांनी केलेले आढळून येते. ...